Wednesday, 25 March 2026

बौद्ध धम्मातील अहिंसा : तत्त्व आणि व्यवहार

 


प्रस्तावना

अहिंसा म्हणजे हिंसा न करणे. परंतु याचे कठोर विश्लेषण केल्यास कोणताही धर्मज्ञ व उपासक त्यांचे तंतोतंत पालन करण्यास अक्षम्य असतो. कारण कळत न कळत प्रत्येकाच्या हातून हिंसा होत असते. जसे कि रस्त्याने चालताना कोणाच्याही पायाखाली सूक्ष्मजीवजंतू येवून त्यांचे मरणप्राय होणे.परंतु बौद्ध धम्मात अहिंसेकडे बघण्याचा अर्थ व परिस्थितीनुसार त्याचा दृष्टीकोन एका वेगळ्या स्वरूपाचा आहे. तो कसा आहे ? हे बघितले पाहिजे. 

अहिंसा : कठोर पालन शक्य आहे का?

मानवी जीवनात नकळत हिंसा होत असते. चालताना पायाखाली सूक्ष्म जीवजंतू येऊन त्यांचा मृत्यू होतो. त्यामुळे अहिंसेचे तंतोतंत पालन करणे अशक्य आहे.

बौद्ध धम्मातील दृष्टिकोन

  • भिक्खूचे शील: भिक्खूने कोणत्याही प्रकारे प्राणिहत्येशी संबंध ठेवू नये.
  • भिक्षेमधील मांस: जर भिक्षेमध्ये मांस मिळाले, तर ते निरपेक्ष भावाने स्वीकारले जाऊ शकते.
  • धार्मिक प्रथांतील हिंसा: यज्ञयागातील जीवहिंसा ही चेतनापूर्वक संज्ञानपूर्वक केली जाते, म्हणून ती त्याज्य आहे.
  • बुद्धांचा उपदेश: “मारू नका, सर्व प्राण्यांविषयी मैत्रीभाव ठेवा.

युद्ध व न्याय

बुद्धांनी न्यायासाठी केलेल्या युद्धांना मनाई केली नव्हती. पाली वाङ्मयातील (लिच्छवी प्रदेश) सिंह सेनापती उपदेश मध्ये त्यांनी स्पष्ट केले की, गुन्हेगाराला शिक्षा व्हायलाच हवी, पण ती द्वेषाशिवाय करुणेने करावी. शिक्षा ही गुन्हेगाराच्या कर्मामुळे मिळते, न्यायाधीशाच्या इच्छेमुळे नव्हे. एखाद्या गुन्हेगाराला मृत्यूदंड झाल्यासही, तो दंड त्याच्या स्वतःच्या कर्माचे फळ आहे, असे समजले पाहिजे. जेव्हा गुन्हेगाराला हे समजते, तेव्हा तो आपल्या दुर्दैवाबद्दल शोक करणे सोडतो.

अहिंसा : नियम नव्हे, शील

बौद्ध धम्मात अहिंसा ही करुणा व मैत्रीशी जोडलेली आहे. ती कठोर नियम नसून एक शील (principle) आहे. कारण जर ती नियम (Rule)  मानली तर वाईटासाठी चांगुलपणाचे बलीदान करावे लागेल किंवा दुर्गुणासाठी सद्‌गुणांची आहुती द्यावी लागेल. म्हणून परिस्थितीनुसार निर्णय घेणे उचित ठरते. तथागतांनी अहिंसेला जीवनाचा एक मार्ग मानले. म्हणून जेथे सद्‌गुणांचा बचाव करावयाचा असेल व हिंसेशिवाय ते शक्य नसेल, तेथेच नाइलाज म्हणून हिंसा करावी लागेल, अशी उपदेशात्मक बुद्धाची शिकवण होती.

मांसाहाराचा प्रश्न

  • पाली बौद्ध वाङमय: बौध्द तत्वज्ञानात प्राणघात करणे निषिद्ध आहे. परंतु मांसाहाराचा निषेध नाही
  • भिक्खूंचे आचरण: भिक्खूदेखील अशा मांसाचे सेवन करीत नाहीत, जे विशेषेकरून व्यक्तिगत रूपाने त्यांच्यासाठीच तयार केले गेले असते.
  • दानकर्त्याचा सन्मान: दानकर्त्याने दिलेल्या अन्नात मांस असेल तर ते नाकारणे म्हणजे त्याचा अपमान होईल. त्यामुळे दानपत्रात आलेले अन्न सेवन केले पाहिजे. हे तथागताच्या कृतीतून सुध्दा दिसून आले आहे

·         परिस्थितीनुसार लवचिकता: तिबेटमध्ये (युरोप व इतर) अन्नधान्ये व फळे, भाजीपाला इ. फार कमी उत्पन्न होतात. तेथे जैविकेसाठी मांसाहार आवश्यक असल्यामुळे तेथील बौद्ध लोक मांसाहार करतात. म्हणून कालमान व परिस्थितीनुसार मांसाहार आवश्यक असल्यास तो निषिद्ध ठरू शकत नाही.

निष्कर्ष

बौद्ध धम्मातील अहिंसा ही निरपेक्ष नियम (Rule )नसून जीवनाचा मार्ग (Principle) आहे. ती करुणा व मैत्रीशी जोडलेली आहे. न्यायासाठी आवश्यक तेव्हा हिंसा स्वीकारली जाऊ शकते, पण ती द्वेषाशिवाय असावी. मांसाहाराबाबतही परिस्थितीनुसार लवचिकता दाखवली जाते

लेखक:बापू राऊत

No comments:

Post a Comment