Wednesday 7 August 2013

‘विपश्यना’ : एक आर्त अनुभूती


डॉ. राजेंद्र बर्वे (युनिक फिचर्स)
विपश्यनेचा कोर्स करण्यापूर्वी मन कितपत साशंक होतं हे आता आठवत नाही, पण साशंक होतं हे नक्की किती आणि कशाबद्दल होतं, हे काळाच्या ओघात विसरून गेलो किंवा विपश्यना घेतल्यानंतर मनातल्या शंका, सूर्यप्रकाशानं विरून जाणा-या धुक्यासारख्या दूर झाल्या. पण ही ज्याच्या त्याच्या अनुभवाची गोष्ट आहे आणि स्वत:ला कोणी कसा अनुभव येऊ द्यावा, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. माझ्या
अनुभवांची गोष्ट सांगतो आहे. माझा व्यवसाय मनोविकारतज्ज्ञाचा. दृष्टीवर कायमच मनोविश्लेषणाचा चष्मा चढवलेला. समोर येणा-या व्यक्तीच्या केवळ बोलण्याचालण्याचा विशिष्ट प्रकारे अन्वय लावायचा, त्याचं विश्लेषण करायचं, त्याचा अर्थ समजून घ्यायचा आणि एखाद्या शास्त्रीय चौकटीत किंवा फ्रेममध्ये त्याला बसवायचं, हा माझ्या रोजीरोटीचा उद्योग. असा विचार करण्याचं प्रशिक्षण स्वत:ला गेली तेवीस वर्ष देत आलो आहे. ते आता अंगवळणी पडलं आहे.
इतर (रुग्ण अथवा कोणीही) व्यक्तीच्या बाबतीत जी ‘अन्वय-विश्लेषण-चौकटीत’ बसवण्याची प्रक्रिया आपसूक घडते; ती स्वत:करता लागू करण्याची सवय तितकीच नकळत लागते. त्यामुळे, कोणताही अनुभव पूर्णार्थानं घेण्यापूर्वीच त्याबद्दल मनातील ‘अन्वय-विश्लेषण-चौकट’ प्रक्रिया कार्यान्वित होते. असं घडल्यामुळे तो अनुभव स्वत:ला पूर्णपणे झोकून देऊन घेता येत नाही. एकदा मनोविकार-मनोविश्लेषणाचा चष्मा चढवला की, (मूळ)दृष्टी आणि ती (विश्लेषण करणारी) नजर एकरूप होऊन जाते. दुर्दैवाने असं घडलं की आपल्या (विश्लेषणतज्ज्ञ) नजरेला जे जाणवतं. तेवढंच सत्य असा ग्रह होतो. गेली अनेक वर्षं मी स्वत:ला त्यापासून वाचवत आलो आहे.
आपल्या जीवनवादी दृष्टिकोनाला झळाळून टाकणारा अनुभव आपल्याला विपश्यनेमधून मिळू शकतो किंवा मला मिळाला. चंद्र-ता-यांच्या पलीकडे आणखी काही ‘व्योम’ असू शकतं व तेही कवळता येतं, याची अतिशय समर्थ जाणीव आपण विपश्यनेमधून घेऊ शकतो.
अतिशय मनापासून नामजप करणा-या, भजनादी गोष्टीत तल्लीन झालेल्या व्यक्तींच्या चेह-यावर सात्त्विक तेज आणि वागण्या-बोलण्यात सहज रसाळपणा, सौजन्यपूर्णता, मंद, सुशांत स्मित पाझरत असतं. ते खोटं असतं असं मी म्हणत नाही, पण मी स्वत:ला तितपत त्यामध्ये झोकून देऊ शकत नाही. कदाचित वर उल्लेख केलेल्या मानस‘शास्त्रीय’ चष्म्यामुळे तसं घडत असावं. त्यामुळे मी एका बुद्धीला पटणा-या, तरीही केवळ बौद्धिक जिज्ञासेपुरत्या मर्यादित न राहाणा-या अनुभवप्रणालीच्या शोधात होतो. तशी अनुभवप्रणाली ‘विपश्यने’मध्ये असावी, आपण ती अनुभवली पाहिजे, पडताळून पाहिली पाहिजे, असं मनोमन वाटू लागलं. अशाच वेळी, ‘झेन’ विचाराशी आडून आडून परिचय झाला.
तीनचार वर्षांपूर्वी फ्रिटजॉफ काप्राचं ‘ताओ ऑफ फिजिक्स’ हे पुस्तक वाचनात आलं आणि त्यातूनच दिशा मिळत गेली. एका आण्विक शास्त्रज्ञानं आध्यात्मिक अनुभवांची किंवा काही मानसिक अनुभवांची त्यामध्ये मनोज्ञ चिकित्सा केली आहे आणि अणुशास्त्र ज्याप्रमाणे सूक्ष्मतम कणाचा अभ्यास करत असतं, त्याचप्रमाणे मनाच्या अभ्यासकाला सूक्ष्मातिसूक्ष्म अनुभूतीचा अभ्यास करण्यासाठी आध्यात्मिक विचारप्रणालीचा उपयोग होत असतो, असं त्यात ठासून प्रतिपादन केलं आहे. त्यामुळे, मनाची सिद्धता झाली असावी. पुढे मुंबई विद्यापीठामध्ये बुद्धविचारांची पदविका शिकवली जाते हे कळलं आणि विविध प्रकारच्या गैरसोयी निभावून नेत मी त्या कोर्ससाठी नाव दिलं.
फॉर्म भरताना विद्यापीठातील तत्त्वज्ञान विभागप्रमुख डॉ. शुभदा जोशी म्हणाल्या, ‘बघा हं, डॉक्टर, कोर्समध्ये विपश्यनेसाठी इगतपुरीला जाणं अनिवार्य आहे!’
माझा सही करणारा हात काही क्षण थबकला. ‘पुढचं पुढे, आता नाव तर दाखल करू’ असा व्यावहारिक विचार करत मी स्वीकार केला आणि कोर्सचे तास सुरूही झाले.
तोपर्यंत मी अर्थात विपश्यनेबद्दल अनभिज्ञ होतो, असं नाही. यापूर्वी अभय बंग, कुमार सप्तर्षी इ. व्यवसायबंधूंच्या अनुभवांविषयी वाचलं होतं. साधारणपणे, परिवर्तनवादी विचारप्रणालीतून विपश्यनेकडे कसं पाहाता येतं, सामाजिक बांधीलकी मानणा-या माणसांकडून अशा केवळ व्यक्तिगत मानता येतील अशा अनुभवांचं विश्लेषण कसं करता येतं, याची कल्पना होती. पण प्रत्यक्ष अनुभव घेण्याची तयारी नव्हती.
मात्र त्यादृष्टीने अनुभव घेण्यासाठी मन सिद्ध होण्याची प्रक्रिया बुद्धविचारांच्या अभ्यासानं सुरू झाली होती.
विपश्यनेच्या कोर्सला जाण्याचं निश्चित केल्यानंतर पत्नी आणि मुलांना माझा निर्णय सांगितला. ११-१२ दिवस घरापासून दूर राहाण्याचा हा पहिला प्रसंग नव्हता. पण तितके दिवस अजिबात संपर्क नाही असं झालं नव्हतं. त्याचबरोबर एकदा विपश्यना घेतली की, ‘बाबा परत येईल ना? की तिथेच भिक्षु म्हणून राहू लागेल?’ अशा शंका उपस्थित झाल्या. मी पबज्जा (प्रवज्या संन्यास) घेणार नाही, एक गृहस्थ म्हणूनच उपोसथ करतो आहे (व्रत-उपास-उपाय) असं समजावून सांगितलं, तरी त्यांच्या चेह-यावरील अस्वस्थता आणि संचितता जाणवत राहिली.
व्यावसायिक पातळीवरून विचार केला तर धम्मगिरीवरील मौनव्रत, बाह्यजगताशी तुटणारा संपर्क आणि केवळ ध्यानधारणा यांचा विपरित परिणाम झालेले रुग्ण मी पाहिले होते. स्वत:च्या विकाराविषयी सातत्याने बोलत राहाणारे न्युरॉटिक्स, ‘चिंतातुरतेमुळे’ विविध मानसिक व शारीरिक लक्षणांनी व्याकुळ होणारे रुग्ण धम्मगिरीवरील विपश्यना सेंटरवर स्थिरावू शकत नाहीत. आपल्याला कसा, कुठे आणि किती तीव्र त्रास होतो आहे, याविषयी वाच्यता केली नाही तर त्यांचा विलक्षण कोंडमारा होतो आणि उदासीनतेच्या कृष्णमेघांनी त्यांचं मन काळवंडून जातं. त्याचप्रमाणे, स्कि‘झोफ्रेनियासारख्या विकारानं मनाचा दुभंग झालेली माणसं मौनव्रत आणि विनासंपर्क वातावरणात अधिक अस्थिर होतात. असा अनुभव मी घेतला होता; एकप्रकारे विपश्यनेच्या मर्यादा लक्षात आल्या होत्या.
अनेकदा, मनोविश्लेषणशास्त्राच्या आधारे किंवा तर्काधिष्ठित विज्ञानाच्या अभ्यासाने विचारवंत, अभ्यासक, प्राध्यापक कोणत्याही विषयातील त्रुटी आणि मर्यादांचा झटकन अंदाज करू शकतात. त्या मर्यादा किंवा त्रुटी सर्वसामान्यांच्या चटकन लक्षात येत नसल्याने अशा विद्वान, विद्याभूषित मंडळींना आपल्या कुशाग्र आकलनाचा विशेष गौरव वाटू लागतो. वादविवादात ते बिनतोड युक्तिवाद करून कोणत्याही विचारप्रणालीमधील मर्यादा प्रभावीपणे दाखवू शकतात. अशा चिकित्सक मनोवृत्तीचं पर्यावसान त्यांच्याही नकळत पराभूत मनोवृत्तीमध्ये किंवा नकारवादामध्ये केव्हा होत जातं, त्यांचं त्यांना कळत नाही. मी प्रयत्नपूर्वक स्वत:ला त्यापासून दूर ठेवतो आहे. मुद्दा असा की, मर्यादा लक्षात आल्या की, त्या त्या विचारप्रणालीमधील अंतर्भूत क्षमता, विस्तार (स्कोप) यांचा विसर पडतो आणि त्या विचारप्रणालींचा आपण सरसकट त्याग करतो.
विपश्यनेच्या मर्यादा लक्षात आल्यानं मी त्या पद्धतीचा ‘स्कोप’ शोधण्याचा प्रयत्न करू इच्छित होतो.
धम्मगिरीचा डोंगर गावाकडे पाठ करून उभा आहे. हिरव्यागर्द वनश्रीमध्ये बाणासारखा उसळून वर जाणारा पॅगोडाचा सुळका अतिशय रम्य वाटतो. त्याची सोनेरी सतेजता, मागील राखाडी, तांबूस डोंगरकड्यावर उठून दिसते. एकूण परिसर साधेपणानं सजवलेला आहे. तुरळक बागा, अतिशय स्वच्छ, बसक्या इमारती, डांबरी रस्ते आणि सर्वत्र दिसणारे साधक यामुळे एकूण परिसराला अतिशय गांभीर्य प्राप्त झालं आहे.
विपश्यना साधना हा विलक्षण व्यक्तिगत अनुभव असल्यामुळे कोणी सामूहिकपणे काम करत नाही. सामूहिक साधना असली तरी सगळ्याचा बाज एकेरी आहे, व्यक्तिकेंद्रित आहे.
सर्वसाधारण आश्रमात आढळणारी सजावट (मोठे मोठे फुलांचे ताटवे, लहान मोठी मंदिरं इ.) इथं अजिबात नाही. आध्यात्मिक साधनेमध्ये भजन, कीर्तन इ. मधून अखंडपणे संगीत पाझरत असतं. इथे त्याचा पूर्ण अभाव. गोएंका गुरुजींचे फोटो, बुद्धांची चित्रं, मूर्ती यांचाही अभाव! साधारणपणे मंदिरात उद्बत्त्यांचा घमघमाट, प्रसादातील पदार्थांचा सात्त्विक वास सदैव सर्वत्र दरवळत असतो, त्याचाही अभाव. इथला एकप्रकारचा कोरडेपणा नि करडेपणा अंगावर आल्यासारखा वाटतो. अर्थात अगदी तासाभरात इथली शांतता सुखद वाटते. तरी काही काळ बंदिस्त एकरंगी पेटीत बंद केलं आहे, असं वाटू शकतं.
राहाण्या-जेवण्याची सोय, नेटकी आणि पुरेशी आहे. गरम पाणी, स्वच्छ बाथरूम, परटाकडे कपडे देण्याची सोय आहे. पाणी ऍक्वागार्डनं निर्जंतुक केलेलं असतं. झोपण्याकरता ठीक गादी, पुरेसं पांघरूण मिळू शकतं. अशा मुलभूत सोयी नेटक्या केल्यामुळे त्या गोष्टींचा विचार करावा लागत नाही.
त्यांचा आग्रह मात्र ठाम आणि स्पष्ट असतो. इथे अमुक प्रकारचे शिस्तपालन करावं लागणार. यात सूट नाही. तो जुलूम समजू नका, कारण तुम्ही अर्ज करून आला आहात. आमचे नियम तुम्हाला ठाऊक आहेत, तेव्हा आला आहात तर कोर्स सोडू नका. ज्या कार्याचा आरंभ केला आहे ते शेवटाला न्या. पहिल्या दिवशी संध्याकाळी एकत्र जमल्यावर ते स्पष्ट इशारा देतात आणि तेव्हापासूनच मौनव्रत सुरू होतं. अर्थात मौनव्रत म्हणजे सांकेतिक खाणाखुणांना मुभा असं मानू नका. त्याप्रमाणे गैरसोय, शंकाकुशंका आल्यास स्वयंसेवक आणि आचार्यांशी थेट शब्दात संवाद करू शकता पण कुजबुजत्या स्वरात बोला, कमी बोला. शक्यतो तेही टाळा.
भोजनकक्षाजवळ एक विनंतीपत्र आहे. हे मौनव्रत आहे याला आर्यमौन अथवा नोबल सायलेन्स म्हणतात (म्हणजे मुस्कटदाबी नाही). एकमेकांशी बोलण्यात वेळ जातो, मनाची चलबिचल होते, अनुभवांना गळती लागते आणि अंतर्मुखतेला बाधा येते. हे सर्व विपरीत टाळण्यासाठी आपण मौन पाळा. त्यासाठी शक्यतो, मान खाली घालून वावरा. कोणाबरोबर चालू नका. स्वतंत्र वाटचाल करा.
पहिल्या दिवशी संध्याकाळी रूमवर परत येताना, ‘काय पाठ सणकत्येय; हैराण झालो बुवा’ असे शब्द ओठापर्यंत आले आणि ते गिळले. क्षणार्धात, एका विलक्षण अनुभवानं शरीर रोमांचित झालं.
मी दुखण्याखुपण्याची अशी जाहीर वाच्यता का करतो? ते करून काय साध्य करतो? थोडीशी वाफ जाऊ देणं, दु:ख हलकं करण्याकरता व्यक्त करणं आणि दु:खाच्या मार्गावरील इतर वाटसरूंना ते पोचवणं. अचानक आलेल्या या उद्गारामधून मी नेमकं काय साध्य करतो? दु:खाची तीव्रता कदाचित किंचितशी मावळते...? आणि अशा दु:ख व्यक्त करण्याकडे साथीदारानं लक्ष दिलं नाही तर तेच द्विगुणित होतं आणि त्याला रागाची धारही चढते.
मी गप्प राहिलो.
त्या क्षुल्लक सहजोद्गारावर इतके विचार तितक्याच सहजपणे मनात उद्भवले. अंतर्मुख होण्याचा हा पहिला पाठ ठरला.
तसा मी स्वभावत: फार बोलका नाही. ‘स्वान्त सुखाय’, छानदार पुस्तक घेऊन सुशील कक्षात शांतपणे बसावं. कंटाळा आल्यास बाहेर चक्कर मारावी अशी मूळ वृत्ती (माणसांशी बोलायची जात्याच इच्छा नसली तरी एकटं राहाता येत नाही! भोवती माणसं असलेली बरी पण त्यांच्या फार अंगचटीला नको. काहीसं मांजरांसारखं!). इथे माझ्यासारख्याला आदर्श वातावरण! ‘स्टे अराऊण्ड पीपल, बट नॉट विथ देम!’
अंतर्मुख होण्याचा हा पहिला पाठ मी उत्तम गिरवला. एक प्रक्रिया म्हणून. पण अंतर्मुख होऊन, मनाचा तळ गाठू लागलो तेव्हा मात्र अत्यंत अस्थिर वाटू लागलं, अर्थात मनातल्या मनात.
मनात ही अस्वस्थता नव्यानं कशी काय सुरू झाली, असं मला वाटू लागलं. एरवी आपण किती सहजपणे वावरतो. किंबहुना, मनात अशी अस्वस्थता घेऊन येणारी कित्येक माणसं हरघडीला भेटतात. त्यांच्याशी आपण संवाद करतो. इतकंच काय, आपल्याशी झडणा-या संवादातून त्यांनाही खूप शांत वाटू लागतं. मग माझ्या मनात हा कोलाहल, व्याकुळता आली कुठून?
मग अगदी हळूच नव्यानं जाण आली. यातील चिंताग्रस्त करणारे विचार किंवा गोष्टी नव्याने आलेल्या नाहीत. ते विषय आपल्या मनात होतेच. आपण त्यांना कामाच्या डोंगराखाली गाडून टाकलं होतं. ते इतके खोलवर गेले की त्यांचं अस्तित्व मिटलं असं आपल्याला वाटलं किंवा इतपतही विचार आपण केला नव्हता. आता ही भुतावळ आपल्याला भेडसावते आहे, ती नव्यानं उपटलेली नाही. भोवती कानावर पडणारे शब्द नाहीत आणि आपण कोणाशीच बोलत नाही. स्वत:शी बोलू लागलो तेव्हा ते आवाज आतून येऊ लागले.
विपश्यना केंद्रात रोज संध्याकाळी तास-सव्वातास गुरुजींचं प्रवचन असतं व्हिडिओ कॅसेटवर. गंमत अशी की, जे प्रश्न दिवसभरातल्या ध्यानधारणेत सतावत असत, त्यांची नेमकी उत्तरं संध्याकाळी मिळत असत. विपश्यनेचा कोर्स हा अत्यंत विचारपूर्वक आखलेला असून तो सहज उलगडत जातो.
विपश्यना म्हणजे ध्यानमार्ग.
सिद्धार्थ गौतमानं आपल्या २९ वर्षांच्या युवराज काळात भरपूर लाडात दिवस काढले. पण सिद्धार्थाने व्याधिग्रस्त व्यक्ती, वृद्धापकाळाने खंगलेला माणूस आणि नंतर प्रेत पाहिलं, अशी कथा सांगितली जाते. जीवनातील दु:खवेदनेचा असा अनुभव आल्यानंतर त्यानं राज्यत्याग करून जीवनाचा अर्थ शोधण्याचा मनोमन प्रयत्न केला. त्यासाठी विरक्त जीवन स्वीकारून प्रथम अदरकलम आणि नंतर उद्रक रामपुत्र या तत्कालीन गुरूंकडून ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न केला. त्याने समाधान न झाल्याने पुढे गयेच्या दिशेनं कूच केलं.
दु:खाचं मूळ या वासनामय देहात असल्याने, त्या देहामधून ती वासना नाहीशी करण्यासाठी शरीराला जर्जर केलं तरच मन पवित्र आणि शुद्ध होऊ शकतं. या विचारानं सिद्धार्थानं पुढील सहा वर्ष अत्यंत कठोर तप केलं. शरीराचे हालहाल झाल्याने ते केवळ अस्थिपंजर झालं पण ज्ञानप्राप्ती झाली नाही. अशा खंगलेल्या देहात वास करणार्या ‘मला’ मुक्ती हवी असेल तर त्या जाणिवांकरता शरीर शिल्लक राहायला हवं, हे जाणवलं आणि सिद्धार्थानं त्याच गावातील सुजाता नामक मुलीकडून अन्नग्रहण केलं. पुन्हा दृढनिश्चय करून, अधिष्ठान मांडलं आणि पौर्णिमेला ते बुद्ध झाले.
बुद्ध होण्याच्या या प्रक्रियेतून त्यांना प्रथमच जीवनाचं चक्र कसं असतं, याची जाणीव झाली. हेच ते पटिच्चसमुपाद. पटिच्चसमुपादाची व्युत्पत्ती बुद्धांच्या या आत्मज्ञानातून होत असते. त्यातूनच त्यांना चार आर्यसत्य गवसली. ती आर्यसत्य हा जीवनमार्ग म्हणून पुढे प्रसिद्ध पावली. ती आर्यसत्यं अशी १) दुक्ख २)तण्हा ३)निब्बाण ४) अष्टांग मार्ग.
यामधील दुखः पुन:पुन्हा कसं निर्माण होतं आणि त्याची समाप्ती कशी करता येईल, याचा मार्ग त्यांना सापडला. तो मार्ग केवळ वर्तनसिद्ध नसून अनुभवसिद्ध आहे. त्यासाठी कोणत्या प्रकारे ध्यान करायला हवं आणि जीवनाकडे कसं पाहायला हवं, याच्या काही पाय-या बुद्धांनी आखून दिल्या.
जीवनाच्या अशा सम्यकदर्शनाचा मार्ग म्हणून पुढे त्याला अष्टांगमार्ग म्हटलं जाऊ लागलं. त्या अष्टांगमार्गाचा तीन भागांत अभ्यास करण्यात येतो. शील, समाधी आणि प्रज्ञा. एकात एक गुंफलेल्या मार्गाचा अवलंब करून आपण निब्बाणांपर्यंत पोहोचतो आणि दुक्खमुक्त होतो. अशा रीतीने आपल्या अनुभवाने दुक्खाचं मूळ आपल्या मनोवृत्ती आणि शरीरप्रक्रियेमध्ये दडलेलं असतं. अत्यंत शांत बसून त्या प्रक्रियेचं निरीक्षण करणं म्हणजे विपश्यना.
प्रत्येक व्यक्तीच्या दुक्खाचं मूळ याच पद्धतीने उलगडता येऊ शकतं. दुक्खाचे प्रकार जरी वेगवेगळे असले आणि त्याची कारणं जरी विविध असली, तरी त्या दुक्खाच्या उत्पादनाची प्रक्रिया एकाच पद्धतीनं होत असते. त्यासाठी शरीर स्थिर ठेवून त्या दुक्खाकडे पाहायला आपण विपश्यनेच्या मार्गाने शिकत असतो.
बुद्धाने हा अष्टांगमार्ग पुढे पंचेचाळीस वर्ष भारतभ्रमण करून सर्वांपर्यंत पोहोचवला. त्या प्रक्रियेची दीक्षा ब्रम्हदेशापर्यंत पोहोचली. भारतातून नाहिशी झालेली ‘विपश्यना’ श्री. सत्यनारायण गोएंकाजींनी पुन्हा एकदा भारतात आणली आणि आता अनेक देशांतील ‘विपश्यना’ केंद्रांतून ती कोणालाही दिली जाते. ती प्रक्रिया संगतवारपणे धम्मगिरीमधील विपश्यना केंद्रात उलगडून दाखविली जाते.
विपश्यनेच्या अनुभवातील शीलपालन एखाद्या पूर्वअटीसारखं स्वीकारलं की आपण आपल्याच मनातील विविध स्वरूपाच्या प्रक्रिया तटस्थपणे पाहू लागतो. त्या प्रक्रियांमुळे निर्माण होणारे दु:ख, भय आणि चिंता आपल्यावर येऊन धडकू लागतात. दु:ख, चिंता आणि भय निर्माण करणारी वस्तुस्थिती किंवा बाह्यस्थिती तर नाही, मग या भावना आल्या कुठून? त्या भावना मनात उपजल्या कारण मनावरचे त्याप्रकारचे संस्कार. आणि दु:ख, चिंता व भय म्हणजे तरी काय हो? त्या अंगावर धडकतात म्हणजे काय? मनाला त्या भावना का नकोशा वाटतात?
मला आठवतं, पाचव्या रात्री मी माझ्या रूमवर आलो तेव्हा मनात असली काही तरी चलबिचल होत होती. मी अस्वस्थपणे येरझा-या घालत होतो. असं वाटत होतं की, एकदा तरी घरी फोन करून सर्वांची ‘याली-खुशाली विचारावी! आईवडील दोघे वृद्ध आहेत, मुलगा अवखळ आहे, ते सर्व सुरक्षित आहेत ना, याची खातरजमा करावी. मन विलक्षण अस्वस्थ झालं. त्यातून असं सांगण्यात आलं होतं, की आपल्या घरून कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूची खबरबात आली तर आम्ही तुम्हाला कळवू. हे वाक्य मला छेडत राहिलं. क्षणोक्षणी वाटत होतं की, कोणीतरी येईल आणि म्हणेल, तुमचा फोन आलाय! या विचारांनी मनाचा थरकाप होऊ लागला. मनातली ही भीती म्हटली तर वास्तविक, म्हटली तर काल्पनिक. मी करू काय? कोर्स सोडून जावं का? त्यांना रिक्वेस्ट करावी का? अखेर मी स्वस्थ बसून राहिलो. श्वासावर लक्ष केंद्रित करून ध्यान करू लागलो. एकीकडे मनात काहूर माजलंय, अर्धवट लक्ष श्वासाकडे आहे. मन चाहूल घेत आहे. कोणी आलं नाही म्हणून बरं वाटतंय, क्षणभरात पुन्हा एकदा भीती उसळून येते आहे. भीतीची ही वादळं मनाला बधीर करीत होती आणि त्याचक्षणी विपश्यनेमधील ’वेदना’ म्हणजे काय, याचा उलगडा झाला.
मी नेमकं काय करत होतो? माझ्या तीव्रतर दु:ख, भय आणि चिंतेचा मी विचार करत होतो. मला सर्व काही ‘आलबेल’ आहे हे जाणण्याची उत्सुकता का होती, कारण त्यामुळे माझी ती दुर्धर अवस्था संपली असती. तो त्रास नकोसा वाटत होता. मनातले ते त्रास नाहीसे व्हावेत, याचा मी जितका ध्यास घेत होतो तितका अधिकाधिक तळमळत होतो. बरं, आप्तांच्या मृत्यूच्या बातमीनं माझ्या काळजाचं कसं पाणी झालं असतं. किती शोक वाटला असता या कल्पनेनंच. मला तो अनुभव दु:सह वाटत होता. तेही मला नको होतं.
मनातल्या विचारांचे भोवरे असे गरागरा फिरत असतानाच मला कधीतरी डोळा लागला. अचानक पहाटे जाग आली. फ्रेश होऊन मी पुन्हा ध्यानाला बसलो. पहाटेचे कदाचित तीन-साडेतीन वाजले असावेत. मनानं घेतलेला ठाव काही सुटत नव्हता. विचारांची आवर्तनं घोंघावत होती. प्रत्येक क्षण नकोसा वाटत होता आणि तो दु:सह ताप मावळावा याचा एकच ध्यास मनानं घेतला. पहाटे चार-साडेचारला पहिली ध्यान-धारणा असते. त्याच अस्वस्थ अवस्थेत तिथे पोहोचलो.
सहा वाजता गुरुजींचे दोहे वाजू लागतात. त्यातील मला आवडलेलं आणि गुरुजींनी निरूपण केलेलं बुद्ध वचन लागलं. असं म्हटलं जातं की ज्ञानप्राप्तीनंतर बुद्धानं हे शब्द उच्चारले...
‘अनेक जाति संसारम्, संधाबिस्सं अनिबिस्सं
गहकारकं गवेसन्तु, दुक्ख जाति पुनप्पुन
गहकारक दिठ्ठोसि पुन गेहं नकाहसि
सब्बा ते फासुका भग्गा, गहकूटं विसि‘तं
विसंखारगमं चित्तम् तण्हानं खयमज्जगा’
मी ते शब्द ऐकले, पहाटेच्या त्या प्रशांत वेळी, पॅगोडाच्या शिखरावरील घंटांचा विलक्षण मंजूळ नाद कानावर पडत होता. मी ध्यानगृहाच्या बाहेर मान खाली घालून फिरत होतो. मंद वा-याची झुळूक अंगावर आली. कुठूनतरी देवचाफ्याचा मंद गंध आला. सर्व अंगभर त्या ‘अवचित परिमाळू’ने सूक्ष्म तरंग उमटले.
मी तसाच रूमवर आलो. आंघोळीला बसलो. गरम पाण्याचा अंगाला स्पर्श झाला आणि पुन्हा एकदा शरीरावर सुखद लहरी उमटल्या. मी असोशीनं गरम पाण्याचे तांबे अंगावर घेऊ लागलो. अंगावरून पाणी निथळून गेल्या गेल्या थंडी वाजायची. पुन्हा गरम पाणी... पुन्हा गरम पाणी... आणि त्याक्षणी मला विपश्यनेमधील ‘वेदना’ गवसली.
थंड हवेमुळे होणारा शरीराचा गारठा नको वाटतो आणि गरम पाण्यानं होणा-या गुदगुदल्या हव्याशा वाटतात. गरम पाण्याने उद्भवलेल्या सुखद (सं)वेदना आणि थंडाव्याने येणारा गारठा दोन्ही किती तात्पुरत्या आहेत. मला त्या सुखसंवेदनांचा हव्यास आहे आणि नकोशा वाटणा-या गारठ्याला दूर करण्याचा ध्यास लागला आहे.
वास्तविक दोन्ही (सं)वेदना अत्यंत तात्पुरत्या आहेत. त्या (सं)वेदना शरीरावर उमलतात आणि मावळतात. जोवर उष्ण पाण्याचा स्पर्श होतोय तोवर (सं)वेदना उमटतात. त्या संवेदना सुखद वाटतात. सुखद संवेदनाचा हव्यास वाढतो. त्याच्यामागे लागलो म्हणून तर अंगावर भसाभस गरम पाणी घेत होतो. तो स्पर्श किती क्षणिक, त्या (सं)वेदना किती निमिषापुरत्या पण त्यामुळे निर्माण झालेला हव्यास मनाला भिडत होता. मनात कसा ठाण मांडून बसला. त्या हव्यासाची वृत्ती कशी झाली, कळलंदेखील नाही!
मी अंग पुसत बाहेर आलो. मनात आता पटिच्चसमुपादातील शब्दन् शब्द उमटू लागले.
‘षळायतन पच्चया फस्स, फस्स पच्चया वेदना
वेदना पच्चया तण्हा, तण्हा पच्चया उपादान,
उपादान पच्चया भवं.’
माझ्या शरीरातील त्वचा इंद्रियाला उबदार पाण्याचा स्पर्श झाला. हीच ती ‘षळायतन पच्चया फस्स’ (फस्स हा पाली शब्द, मूळ शब्द स्पर्श) ही पायरी. या स्पर्शामुळे शरीरात एक वेदना (म्हणजे दु:ख, कळ या अर्थाने नव्हे तर संवेदना या प्रचलित अर्थाने) निर्माण झाली. ही संवेदना केवळ लहर नसून सुख (सं)वेदना होती. मला ती आवडली. एकदा अशी (सं)वेदना आवडली की आपण पुढच्या पायरीवर आलो.
‘फस्स पच्चया वेदना’, सुख (सं)वेदना हवीहवीशी वाटते. त्यातूनच त्याची आस म्हणजे तृष्णा जागृत होते, हीच ती ‘वेदना पच्चया तण्हा’, या हव्यासातूनच निर्माण झाला तिचा ध्यास, त्या तृष्णेला चिकटून राहाणं. म्हणजेच ‘तण्हा पच्चया उपादान’. आणि या चिकटून राहाण्यामुळे लागली त्याची सवय, पुन्हापुन्हा ती (सं)वेदना यावी याकरता होणारी इंद्रियांची असोशी म्हणजेच ‘उपादान पच्चया भव!’
बुद्धानं खरं म्हणजे ‘फस्स पच्चया वेदना’ या पायरीचा शोध लावला. आतापर्यंत दुक्खाचं कारण शोधण्याकरता सर्वांचा घाला पंचेंद्रियांवर होता. त्या इंद्रियांना काबूत ठेवा, त्यांचे चोचले पुरवू नका असे सारे ध्यानमार्गी सांगत होते. बुद्धाने त्या पंचेंद्रियांना मुक्त केलं आणि पंचेंद्रिय व बाह्यजगतातील वस्तुमात्र यांच्या परस्पर भेटीगाठीतून वेदना निर्माण होणं हे अटळ मानलं. आपण काहीही केलं तरी शरीर (नामरूप) व त्याच्या पंचेंद्रियांचा (मन हे सहावं इंद्रिय मानल्यामुळे षळायतन - सहा बाह्यजगताशी संपर्क येणार. त्या संपर्कातून जी संवेदना निर्माण होते, ती मात्र ज्या त्या वस्तुमात्राची स्वतंत्र असते. ती आपली आपण निर्माण होते. त्या वेदनेचं परिशीलन करायला हवं असं म्हटलं.
बुद्ध तर्कनिष्ठ, विज्ञानवादी. त्यांच्या लक्षात आलं की, ‘षळायतन पच्चया फस्स’ ही गोष्ट जिवंत नसून एक वस्तुगत (फिजिकल) क्रिया आहे आणि संपर्कामुळे निर्माण होणारी (षळायतन व बाह्यजगातील वस्तूंचा स्पर्श) ही क्रिया किती काळ टिकणार? जोवर या दोहोंचा संपर्क आहे, तोवरच ती टिकणार. एकदा हा संपर्क तुटला की आपोआपच त्या (संवेदना) मावळणार.
सुग्रास अन्नाची चव किती काळ उपभोगणार? जोवर घास तोंडात आहे, तोवरच त्याची चव जाणवते. एकदा घास घशात गेला की त्याची (सुख सं)वेदना संपली. एकूण या अस्थिर जगातल्या संपर्कानी निर्माण होणा-या (सं)वेदनांचा अवधी अगदी क्षणिक असतो. या (सुख सं)वेदना उमटतात अन् मावळतात. त्यांना काही कालावधीच लागत नाही. आपण मात्र त्या क्षणभंगुर वेदनेचा ध्यास घेतो, नकोशा (दु:ख)वेदना टाळण्याच्या मागे लागतो आणि हव्याशा वाटणा-या वेदनांचा हव्यास धरतो. एकदा हा हव्यास मनात निर्माण झाला की, आपण दुक्खाच्या चक्रात अडकलोच म्हणून समजा!
पटिच्चसमुपादामधील या पाय-या एखाद्या आधुनिक न्युरोसायकोफिजिऑलॉजिस्टनं लिहाव्या इतक्या निखळ आणि अचूक आहेत. मला त्यातील एकेका पायरीचा अनुभव त्या पहाटे आला.
मीदेखील असाच दु:खाचा, अस्वस्थतेचा प्रवासी झालो होतो. माझ्या मनाला ध्यास लागला होता. मला ‘ती’ अस्वस्थता नको होती आणि सुशांत भाव मनात येण्याची आस लागली होती. मी तळमळत होतो ती आस मिटावी म्हणून.
माझ्या लक्षात आलं, की एकदा फोन करून आलबेल असल्याची खबरबात मिळून मन नक्कीच शांत होईल. पण फोन ठेवता क्षणीच माझा संपर्क तुटेल आणि पुन्हा एकदा मी त्याच काळजीच्या फे-यात अडकून जाईन. कोणत्याही क्षणी काहीही घडू शकतं, त्यामुळे सर्व काही आलबेल असण्याचं समाधन कसं काय टिकावं? ते समाधान क्षणिकच राहील आणि मी पुन्हा त्यांचाच ध्यास घेईन. क्षणिक समाधान, वेदनेच्या मागे लागून सातत्याने अस्वस्थ राहीन!
माझ्या मनातली कोडी अलगद सुटत चालली.
इकडे ध्यानमंडपात जाऊन मी पुन्हा ध्यान करत बसलो होतो. असं वाटलं की, मनाच्या जलाशयात क्षणोक्षणी बदल होत आहेत. एखादी वेदना उमटत आहे, मिटत आहे. उद्भवत आहे. विलय पावत आहे. या वेदनांच्या लहरी शरीरावर उमटत आहेत. सुखद विचार आला की, अंगभर शहारून येतं तर त्रासदायक विचारानं अंग गोठून जातं.
शरीराचा प्रत्येक भाग त्या प्रक्रियेत समाविष्ट होतो आहे.
माझ्या लक्षात आलं की क्षणोक्षणी उद्भवणा-या व विनाश होणा-या अनेकविध (सं)वेदना घेत असताना माझ्या मनातल्या शंका-कुशंका केव्हातरी विरून गेल्या. मी खरोखरीच शांत झालो. हे मला यापूर्वी अर्थातच माहिती होतं. पण त्याचा पूर्ण शारीरिक-मानसिक अनुभव घेतलेला नव्हता.
विपश्यनेचा एकेक दिवस म्हणजे नव्या जागृती, नव्यानं येणारी समज आणि गैरसमजांचं निराकरण. गुरुजी म्हणत होते, साधकांची अशीही एक अवस्था येते जेव्हा मनातील विचारांमुळे उद्भवणा-या (सुख सं)वेदना आणि अंगभर पसरणा-या सूक्ष्म लहरी अतिशय प्रसन्न करणार्या वाटू लागतात. मनाच्या प्रशांत अवस्थेची ओढ वाटू लागते. पुन्हा पुन्हा (सं)वेदना उमटाव्या, असं वाटू लागतं आणि तशा न निर्माण झाल्यास आपण पुन्हा एकदा दुक्खवेदनेची वाटचाल करू लागतो.
मला उत्सुकता लागून राहिली, हे सारं मनात घडतं तरी कसं? याबद्दल बुद्धविचार कोणते? मनोव्यापारासंबंधी बुद्धाने भाष्य केलं. कारण, दुक्ख जाणवतं आपल्याला मनात, त्या दु:खाचा उगम हव्यासात मानला तरी हव्यास जाणवतो आपल्याला मनातच ना!
याबद्दल बुद्धाचं काय म्हणणं होतं? कोणत्याही गोष्टीची फोड करायची. त्या विविध भागांचा अथवा पायर्यांचा परस्परांशी संबंध कसा असतो, हे तपासून पाहाणं ही बुद्धाची अभ्यासपद्धती.
बुद्धविचारानुसार मनामध्ये चार पातळ्यांवर क्रिया घडतात व त्या पातळ्यांचा परस्परांशी संबंध असतो. एकातून दुसरी, अशाप्रकारे त्या क्रिया-प्रक्रिया उलगडत जातात. त्या पातळ्या अशा -
१) विन्याण (विज्ञान अथवा जागृतावस्था)
२) संन्या (संज्ञा अथवा ओळखणं)
३) वेदना (संवेदना या अर्थानं)
४) संखार (संस्कार अथवा प्रतिसादाचे नमुने)
पटिच्चसमुपादामध्ये याच चार पातळ्यांचा वेगळ्या अर्थानं उल्लेख केलेला आहे. बुद्धानं असंही म्हटलं की, या चारही पातळ्या अत्यंत गतिमान असतात आणि त्यांची अशी गतिमानता हेच त्या प्रक्रियेचं खरंखुरं स्वरूप आहे.
विन्याणाकडून जाणवणा-या जाणिवाच मुळी एखाद्या रासायनिक प्रक्रियेसारख्या असतात. त्यामुळे त्या क्षणोक्षणी बदलत असतात. अशा सातत्याने बदलणार्या प्रक्रियेला एका विशिष्ट प्रकारच्या संज्ञेत (आधुनिक अर्थानं, नास, नाव) अडकवून टाकणं म्हणजे या गतिमान जीवनाचं स्वरूप न समजणं. म्हणूनच बुद्धाने आत्मा आणि शरीर असं भिन्न न मानता त्या दोघांचा एकसंध आणि सदैव गतिमान असणारा, बदलणारा प्रवाह म्हणजे जीवन असं म्हटलं.
ज्याप्रमाणे, मनाचा अभ्यास करून बुद्धानं चार प्रक्रिया मांडल्या, त्याचप्रमाणे शरीराविषयी बुद्धानं म्हटलं की, चार महाभूतांच्या विविध प्रकारच्या संचयातून निर्माण होणारा जो अणू असतो, त्याला ‘कलाप’ म्हणावं. ‘कलाप’ म्हणजे सातत्याने बदलणारा, गतिमान (डायनॅमिक) असा कण. असे कोट्यवधी कण एकत्र आले की, त्यांचा एकसंध परिणाम भासतो. त्यालाच आपण (मानवी) शरीर किंवा जिवंतमात्र म्हणतो.
बुद्धाच्या या विश्लेषणामध्ये वस्तुत: अत्याधुनिक मानल्या जाणा-या अणुरूपाचं वर्णन मांडलेलं आहे. अणूमधील अस्थिर, सदैव गतिमान असणारे इलेक्ट्रॉनचे कण अतिशय गतिमान असल्यानेच स्थिर भासतात. असे कण स्थिर भासले तरी गतिमान असतात आणि ते एखाद्या विशिष्ट क्षणी (क्षण ङ्गार मोठा कालावधी झाला!) कुठे असतील, याविषयी ज्याप्रमाणे ठाम विधान करता येत नाही, केवळ शक्यता वर्तवता येते, त्यातूनच पार्टिकल आणि वेव्ह थियरीचा उगम झाला.
एकेदिवशी आनपान ध्यान केल्यानंतर विपश्यनेचा अभ्यास करताना पुन्हा एकदा नव्या जाणिवा होऊ लागल्या. त्या जाणिवा होतात न होतात तोच नाहीशा होत. त्या जाणिवांचं स्वरूपच उलगडत नव्हतं. काहीतरी वेगळ्या जाणिवा होत्या एवढंच जाणवत होतं. एव्हाना, कोणत्याही (सं)वेदना हव्याहव्याशा आणि नकोशा अशा रीतीने द्विभाजित करून अनुभवण्याची सवय मावळली होती.
गुरुजींच्या सांगण्याप्रमाणे शरीरात उमटणा-या सर्व जाणिवांकडे पाहात होतो. श्वासाची जाणीव फारतर नाकापुरती मर्यादित असते. पण हाच श्वास, ती हवा, घशातून हळूहळू छातीत उतरल्याची जाणीव होऊ लागली. असं वाटलं की, श्वासनलिकेतील हवेची स्पंदनं आपण अनुभवतो आहोत.
क्षणभर विचार आला हे कसं शक्य आहे? किती सूक्ष्मतम गोष्ट आहे ही. त्याचक्षणी लक्षात आलं की, अतिशय स्वस्थ बसून रिलॅक्स होऊ लागलो की आपल्याला हृदयाचे ठोके जाणवतात. एरवी कुठे जाणवतात? आपण नेहमीपेक्षा अधिक रिलॅक्स झालो आहोत म्हणून छातीतील हवेच्या हालचाली जाणवत आहेत! मग या चिकित्सक, साशंक मनाला रजा दिली आणि पुन्हा एकदा प्रयत्न करून श्वासावर लक्ष केंद्रित केलं.
माझ्या हृदयाचे ठोके जाणवू लागले. नेहमीसारखे ठकठक नव्हे तर हृदयाचा डावा कप्पा छातीवर सूक्ष्मपणे आदळतो. त्याच्या जाणिवा होऊ लागल्या. हळूहळू शरीरातील अनेक हालचाली जाणवू लागल्या. मन अतिशय स्थिर होतं. ही स्पंदनं, ठोके आपापल्या गतीनं चालले होते. त्यांच्या हालचाली सूक्ष्म पण नियमित, जिवंत तरी यांत्रिक अशा स्वरूपाच्या होत्या.
श्वासावर लक्ष केंद्रित होतं ते तसंच राहिलं. आस्ते-आस्ते, हृदयाच्या ठोक्यांच्या जाणिवा अस्पष्ट होत गेल्या. सर्व शरीराला एकसंधपणा आला. जणू काही एखादी फॅक्टरी अहोरात्र नि:शब्दपणे, काटेकोरपणे काम करते आहे, अशा या जाणिवा असाव्यात (इथे मांडलेले अनुभव नंतर आठवल्यानंतरच त्यावर विचार करून इथे लिहितो आहे. प्रत्यक्षात ‘काहीतरी’ घडतंय एवढंच जाणवत होतं).
पण श्वासोच्छ्वासाच्या हालचाली अगदी सुस्पष्ट होत्या. श्वासाचं आत येणं नि बाहेर जाणं ही एक यांत्रिकपणे, नियमबद्ध हालचाल होती. शरीर जणू काही एक पंप किंवा कृत्रिम श्वासोच्छ्वासाचं यंत्र आहे, असं वाटू लागलं. श्वास म्हणजे या यंत्राची उघडझाप होते आहे. श्वास आत येतो-जातो, ही घटना झडपेची उघडझाप आहे असं वाटू लागलं. संपूर्ण शरीरामध्ये सूक्ष्मातिसूक्ष्मपणे कण फुटत आहेत, असं वाटत होतं.
म्हटली तर आल्हाददायक, म्हटली तर यांत्रिक अशी अवस्था होती. मी या अनुभवाचा एक प्रकारचा साक्षीदार होतो पण त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे मी त्यात अधिकाधिक विरघळून जात होतो. कोणत्यातरी एके क्षणी ही तंद्री भंग पावली आणि मी पुन्हा स्वत:ला एकत्र केलं.
पुढे ध्यानकक्षामधील आचार्यांना हा अनुभव सांगितला. त्यांनी मंद स्मित करून शुभेच्छा दिल्या, हुरळून जाऊ नका. पण अनुभव चांगला आहे. विपश्यनेचा अभ्यास सोडू नका, असं सांगितलं.
कदाचित बुद्धांना अशाच प्रकारच्या अतितरल जाणिवा झाल्या असतील. सगळं विश्व क्षणोक्षणी बदलत आहे. सगळीकडे, अणूरेणूंची उत्पत्ती आणि लय होतो आहे. त्या अणूरेणूंच्या घटनविघटनामधून अनेक जीवजंतू निर्माण होत आहेत. सारं कसं अत्यंत गतिमान, तरी स्थिर. जिवंत तरीही यांत्रिक, बदलणारं तरी नियमबद्ध असं घडत असावं. सार्या उत्पत्तीलयाचं महान नाट्य बुद्धांनी कवळलं असावं. कदाचित त्याच अनुभवातून त्यांना आपलीच वेगवेगळी रूपं जाणवली असतील.
विपश्येनेचे दहा-अकरा दिवस केव्हाच उलटून गेले.
मौनव्रत इतकं अंगवळणी पडलं की दहाव्या दिवशी कशाला बोलायचं, असं वाटलं!
पण तेही क्षणिकच ठरलं म्हणा. अखेरच्या दिवशी मौनव्रत संपल्यासंपल्या मी ध्यानमंडपाबाहेर पडतो तर माझ्याभोवती गराडा. आम्ही तुम्हाला ओळखलं, आपण मनोविकारतज्ज्ञ डॉ. बर्वे! आपल्याला काय वाटलं? आपण इथे कसे? तुमचं कार्ड मिळेल का? मी शांत-तटस्थपणे उत्तरं देत राहिलो आणि पहिल्या संधीचा फायदा घेऊन निसटलो.
विपश्यना केंद्रामध्ये पॅगोडासमोर एक जागा आहे. तिथं उभं राहिल्यास इगतपुरीकडे मंदावत चालणा-या गाड्या दिसतात. खूप दूरवर नाशिक-मुंबई हाय-वे दिसतो.
का कोण जाणे, तिथे अनेकजण उभे राहून फावल्यावेळात निरीक्षण करतात. येणार्या जाणा-या गाड्यांकडे बघत वेळ बरा जात असावा. मला त्या येणा-या जाणा-या गाड्यादेखील एक प्रकारची वेदना वाटू लागल्या. किती क्षणभंगुर अशी वाटचाल. विशिष्ट दिशेनं जाणारी गाडी; जोवर हलते आहे तोवर उपयुक्त आणि जिवंत. थांबली की कर्कश्श ओरडून जीव नकोसा करते. मी त्या गाड्यांकडे पाठ करून बसत असे.
समोर पॅगोडा शांतपणे उजळत असे. त्यावरील सुवर्णरंग, त्याचा घाटदार टोकेरी कळस, सर्व बाजूला असणारे नक्षीकाम केलेले जिने आणि कोरीव काम करून काढलेले सिंह अतिशय मनमोहक वाटतात. त्या पॅगोडात जिवंतपणा जाणवतो. विपश्यना केंद्रावर त्या पॅगोडाचं शांत, प्रभावी तरीही सर्वसमावेशक असं अधिराज्य आहे, असं वाटतं. त्या पॅगोडाच्या पोटात काय असावं, याची खूप उत्सुकता होती. एक दिवस आचार्यांनी बोलावून शून्यागारात, ध्यान करण्याची परवानगी तुम्हाला मिळाली आहे असं सूचित केलं.
शून्यागार ही मंदप्रकाशित साधारणपणे आठ बाय चार अशी एकीकडे निमुळती होणारी खोली. आतल्या बाजूला तोंड करून ध्यान करण्याची सूचना देऊन स्वयंसेवकाने दरवाजा बंद केला आणि आपण खरोखरच आपल्या कॉफिनमध्ये बसलो आहोत, असं वाटलं. क्षणभरच!
शून्यागारात बसणं एक प्रकारचा प्रयोग आहे. मानसशास्त्रीय परिभाषेत त्याला ‘सेन्सरी डिप्रायव्हेशन’ म्हणता येईल. इंद्रियांना व मनाला (मेंदूला) चेतवणा-या संवेदनांना मज्जाव केला की मनाच्या अवस्था बदलू लागतात. बाहेरनं येणा-या संवेदनांच्या अनुपस्थितीमध्ये मन (मेंदू) आतल्या प्रक्रियेने संवेदना निर्माण करू शकतो. त्यामुळे भास-आभास, भ्रम-विभ्रमाच्या जाळ्यात आपण अडकू शकतो. तीच प्रक्रिया काही प्रमाणात शून्यागारामध्ये निर्माण केली जाते. आपण आपल्या मानसप्रकि‘यांवर लक्ष केंदि‘त करू शकतो. तो अनुभव बोलका आणि नव्या जाणिवा व भान निर्माण करतो.
शून्यागारातील अनुभव अर्थातच अधिक सखोल आणि सधन होता. आपलं एक स्वतंत्र जग असून आपण त्यात गढून गेलो आहोत, असं वाटलं. पॅगोडावरच्या घंटांचा नाद आणि त्याची स्पंदनं अधिक भिडली. हे सारं घडत असताना, मनोविकारतज्ज्ञ, मनोविश्लेषक नावाचे चष्मे गळून पडले किंवा हरवले. मी अधिक विस्तृत आणि सम्यकपणे जीवनाकडे पाहू शकलो असं वाटलं. त्याहून अधिक महत्त्वाचं असं की, स्वत:च्या मनोशारीरिक घडामोडींचा इतक्या जवळून अभ्यास करण्याची ही संधी केवळ अनमोल वाटली.
विपश्यनेचा साधक आणि अभ्यासक म्हणून येणार्या व्यक्तिगत अनुभवाला अधिक व्यापक, सामाजिक आणि वैश्विक आयाम देण्याचं पर्व अखेरच्या दिवशी सुरू होतं.
बुद्धाने मुळात समाधीचे दोन टप्पे मांडलेत. पहिला व्यक्तिगत पातळीवरील निब्बाणाकडे घेऊन जाणारा आणि त्यापुढील टप्पा मेत्त भावना म्हणजे भवतालच्या प्राणिमात्र, जिवंत वस्तुमात्र, माणसं, आपले गुरू/आचार्य, पालक, जोडीदार, मित्रगण आणि अखेरीस आपल्याशी वैर मानणारे शत्रू या सर्वांकरता करायची प्रार्थना. सर्वांचं मंगल व्हावं, ते निर्वैर व्हावेत. त्यांच्यामधील दुष्टभावना, दु:खाचं किटाळ, अमंगलत्व दूर व्हावं यासाठी करायची प्रार्थना.
बुद्धानं मेत्त, करुणा, मुदिता आणि उपेक्खा या होकारात्मक भावना प्रगतिशील मानल्या. या भावनांच्या जोपासनेमुळे दु:ख नाहीसं होतं. इतकंच नव्हे तर ‘मेत्त’ अथवा मैत्रीभावनेला, मानवी जीवनात त्याने अनन्यसाधारण महत्त्व दिलं.
भ‘ष्टाचार, गुन्हेगारी, स्वार्थी-अप्पलपोटेपणा, संधिसाधू अशा सद्य वातावरणाशी विपश्यनेचा कसा संबंध जोडता येईल? विपश्यनेच्या पालनाने भारताचे अनेक सामाजिक विषमतेचे प्रश्न सुटतील का, असा प्रश्न एक सुजाण देशप्रेमी नागरिक म्हणून आपल्याला छेडू लागतो.
गुरुजींनी याबाबतीत काही प्रयोग करून ठाशीव सत्यं समोर मांडलेली आहेत. तिहार व इतर जेलमधील कैद्यांचे अनुभव, गुरुजींच्या गुरूंनी ब्रम्हदेशात केलेले प्रयोग विशेष आहेत. विपश्यना मार्गाचा अवलंब केल्यास भ्रष्टाचाराचा प्रश्न सुटेल का? हिंसात्मक दंगली, वैरभाव या भीषण समस्या सुटतील का? असे प्रश्न साहजिकपणे निर्माण होतात. व्यक्तींमधील परिवर्तन करणा-या सर्वच पद्धतींमुळे सर्व सामाजिक प्रश्न सुटतील का किंवा सुटावे असं आपल्याला मनोमन वाटतं! खरं तर प्रत्यक्ष उपयोजनेशिवाय याला उत्तर देता येणार नाही. तसं पाहिलं तर कोणत्याच सामाजिक परिवर्तन करू शकणार्या आर्थिक वा सामाजिक विचारप्रणालीने देखील ते प्रश्न सुटलेले नाहीत. सामाजिक परिवर्तनाचं अखेरचं लघुत्तम टोक व्यक्ती हेच असतं. त्या व्यक्तीमध्ये बदल घडल्याखेरीज सामाजिक परिवर्तन अशक्य होतं. व्यक्ती-व्यक्तीमधील परिवर्तनानेच एक ‘क्रिटिकल मास’ निर्माण होतो व त्याच्या रेट्यामुळे समाजामध्ये होकारात्मक स्थित्यंतर होतात.
त्यामुळे विपश्यनेमुळे भ्रष्टाचार थांबेल का? जातिवाद, धर्माधर्मातील वैर नष्ट होईल का? तर त्याचं उत्तर व्यक्तिगत पातळीवर होकारात्मक व सामाजिक पातळीवर प्रयोग करून बघण्यास योग्य असं मिळेल.
मी स्वत:देखील बराच काळ या सर्व व्यक्तिगत परिवर्तनवादी विचारप्रणालींकडे काहीसं साशंकपणे पाहात असे. अजूनही डाव्या विचारसरणीची मंडळी अशा विचारप्रणालींकडे व्यक्तिगत उन्नतीला प्राधान्य देणारे ‘पेटी बुर्झ्वा’ म्हणून पाहात असावीत. समाजवादी मंडळी, हिंदुत्ववादींच्या छुप्या अजेंड्याचं गोंडस रूप म्हणून अशा विचारप्रणालींकडे पाहातात.
भारतीय विचारपरंपरेचं सुरुवातीला तर्कनिष्ठ वाटणारं टोक पुढेपुढे शोषणवादी, मनुवादी, स्त्रीशोषणवादीपर्यंत पोहोचतं, त्यामुळे योग, ध्यान या सर्व एतद्देशीय विचारांकडे साशंकतेनं पाहिलं जातं. विपश्यनेच्या बाबतीत सामाजिक समता आणि भेदभावरहित विचारप्रणालीचा एक आदर्श नमुना म्हणून अंगुलीनिर्देश करता येईल.
शील, समाधी आणि प्रज्ञा हा अष्टांग मार्ग बुद्धानं घालून दिला. यामधील प्रज्ञा अथवा सखोल मर्मग्राही अंतर्ज्ञान किंवा समज/शहाणपण ही सर्वांत वरची आणि महत्त्वाची पायरी.
यापैकी म्हटलं तर ‘समाधी’ची पायरी अधिक लोकप्रिय आणि समाजाने उचलून धरलेली. शीलपालन म्हणजे स्वत:च्या मोहाला क्षणोक्षणी अडवावं लागतं. उपजत सुखलोलुपता, आळशीपणा किंवा शॉर्टकट शोधण्याची प्रवृत्ती शीलपालनाचा केव्हाच बळी घेतात. त्यामानानं ‘समाधी’ ही गोष्ट विशिष्ट कालापुरती मर्यादित! (अशी सोईस्कर समजूत करून घेतलेली). एके ठिकाणी बसून, आनपान समाधी साधना केली की निसर्गत:च मन शांत आणि प्रसन्न होऊ शकतं. थंडीच्या दिवसात आपण वेगानं फिरणा-या पंख्याखाली बसलेलो असताना प्रत्येक क्षण अस्थिर असतो. अंगावरील वा-याच्या झोतामुळे आपण हैराण होतो. अशावेळी पंखा बंद केला की हळूहळू वा-याचे झोत मंदावतात आणि थंडीचा तडाखा बसण्याचं थांबतं. पंखा थांबल्यामुळे ‘रिलीफ’ मिळतो आणि वाटतं, सुटला वाटतं आपला प्रॉब्लेम! तसं समाधी अवस्थेचं असतं.
समाधीने लाभलेला मनाचा प्रशांतपणा आपण टिकवून ठेवू शकत नाही. काही काळ त्या प्रशांतपणाच्या (क्षणिक) अनुभवानं मनाला प्रफुल्लितपणा येतो. तरतरी आणि उत्साह वाटतो. मनावरील ताणतणावांचा काही काळ विसर पडतो किंवा त्यांची फारशी क्षिती वाटत नाही. ही अवस्था अर्थातच फार काळ टिकत नसते. पुन्हा मनाच्या खोल काळ्या कपारींतील झर्यातून तणाव झिरपू लागतो. पुन्हा एकदा मन तणावग्रस्त झालं की आपण समाधीच्या मार्गानं उपसा करून टाकतो. शीलपालनामुळे हे झरे मुळातूनच बुजू शकतात.
समाधीचा अनुभव विलक्षण तरल, सूक्ष्म आणि मनाला उंचावणारा (ट्रान्सडेंटल) असतो. मनाचं उन्नयन होत असण्याची जाणीव भारून टाकणारी आणि सुखद असते. बुद्धानं मात्र या समाधीवस्थेबद्दल फार स्पष्ट भूमिका घेतली आणि समाधी हे ध्येय न मानता साधन मानलं. मनाची प्रगाढ, प्रशांत अवस्था टिकणारी नसते. तो एक प्रकारचा (सुख सं)वेदनांचा खेळ ठरतो. दु:ख जितकं अनिच्च (अनित्य), तितकंच हे (समाधी) सुखही अनिच्च. म्हणूनच समाधीचे अनुभव घेऊन दशांगुळे उरतं ते दु:ख. बुद्धानं असा प्रज्ञावाद मांडल्यामुळे समाधीच्या सुखद अनुभवांचा मोह माणसांना पडत नाही. वर म्हटल्याप्रमाणे मनाच्या कडेकपारीतील झरे जर शीलपालनाने बुजत असतील, तर ते शोधण्याची प्रक्रिया प्रज्ञेच्या प्रकाशातच घडू शकते.
बुद्धाच्या अष्टांगमार्गामध्ये कोणतीही टोकाची भूमिका आढळून येत नाही. खूप व्यावहारिक आणि समजदार अशी ती वाटचाल वाटते, म्हणूनच त्या मार्गाला मज्झिम (मध्यम) मार्ग म्हटलं जातं. विपश्यनेच्या अभ्यासक्रमात या अष्टांग मार्गाचा उलगडा होत जातो. त्या कोर्सची रचना अशा खुबीनं केली आहे की, त्यामुळे हा मानसिक प्रवास अलगदपणे होतो.


डॉ. राजेंद्र बर्वे
टर्निंग पॉईंट परिवर्तन, बी-२, इंद्रायणी कॉम्प्लेक्स,
ए. के. सावन रोड, दादर (प).
फोन : ०२२- २४३८२५२५, २६११४६७६.

No comments:

Post a Comment